ही दोस्ती तुटायची नाय हे नाटक एका अशा जोडप्याची गोष्ट सांगते ज्यांनी लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण केल्यानंतर घटस्फोटासाठी अर्ज केलेला असतो. न्यायालयाच्या आदेशानुसार ते एका समुपदेशक दाम्पत्याला भेटतात आणि त्या भेटीतून त्यांच्या नात्यातील अनेक थर, आठवणी, तक्रारी, प्रेम आणि न बोललेले भाव हळूहळू उलगडत जातात. आयुष्यातील छोट्या-मोठ्या प्रसंगांतून घडत गेलेल्या या नात्याचा वेध घेताना नाटक विनोदी, भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या क्षणांनी समृद्ध होत जाते.
आजच्या काळात अनेक नात्यांमध्ये हरवत चाललेले संवाद, समजूत आणि परस्परांचा आदर यांचा शोध हे नाटक घेतं. विशेष म्हणजे पन्नाशी ओलांडलेल्या जोडप्यांच्या नात्यातील गुंतागुंत आणि त्यातील उबदारपणा याकडे पाहणारा हा एक वेगळा दृष्टिकोन आहे. त्यामुळे ही कथा सर्व पिढ्यांतील प्रेक्षकांना आपलीशी वाटते.
ओंकार गोखले लिखित आणि सूरज पारसनीस दिग्दर्शित “ही दोस्ती तुटायची नाय” या नाटकाची निर्मिती अष्टविनायकचे दिलीप जाधव आणि नाट्यलीला थिएटर्सचे सुमीत राघवन यांनी केली आहे. या नाटकात चिन्मयी सुमीत, अमृता बाणे, शुभंकर एकबोटे आणि सुमीत राघवन हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
