एखादी कलाकृती अत्यंत यशस्वी ठरली की, तिच्या पुढील निर्मितीविषयी अपेक्षा गगनाला भिडतात. अनेक वेळा निर्माते त्या यशाच्या दबावाखाली राहून, पुढच्या सादरीकरणात गिमिक्स, अतिशयोक्ती, वा नुसते भव्य दृश्यात्मक प्रभाव यांचा वापर करताना दिसतात. अशा वेळी मूळ कथानकाचा आत्मा हरवण्याची शक्यता निर्माण होते आणि प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होतो. मात्र, रूपक निर्मित ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या कलाकृतीने हा दृष्टीकोन मोडीत काढला आहे. त्यांनी यशाच्या मोहात न पडता, पुन्हा एकदा, सखोल आशय व विचारमंथनाच्या जोरावर एक उत्तम नाट्यनिर्मिती घडवली आहे. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ एक वेगळा आणि गहिरा अनुभव देणारी कलाकृती ठरली आहे. ‘प्रिय भाई एक कविता हवी आहे!’ आणि ‘कवी जातो तेव्हा’ मध्ये साहित्याचा गंध दरवळत होता तसा ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’मध्ये भक्तिरसाचा ओतप्रोत समावेश आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या एका अनोख्या प्रवासाची ही कथा आहे. डॉ. समीर कुलकर्णी लिखित अमित वझे दिग्दर्शित ही कलाकृती, विठ्ठलभक्तीच्या पलीकडे जाऊन, मानवी मनाच्या खोल गूढतेत प्रवेश करते.
नाटकाची अनोखी मांडणी
ही कलाकृती केवळ संतपरंपरेची गाथा नाही, तर आपण स्वतःला आरशात पाहायला घाबरतो त्या क्षणांचा वेध घेणारी आध्यात्मिक यात्रा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक असा कोपरा असतो, जिथे भीती, क्रोध, अहंकार, दुःख आणि बीभत्सतेचं वास्तव्य असतं. या नाटकात त्या कोपऱ्याचा शोध घेतला जातो आणि अशा अंधाऱ्या जागेतही ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याला त्याला प्रकाश कसा मिळवून देतो, हे सूचित करणारं हे नाटक आहे.
सौदामिनीची कथा – पण ती प्रत्येकाचीच आहे!
ही कथा सौदामिनी नावाच्या पात्राभोवती फिरते. मात्र, ही फक्त तिचीच कथा नाही; ती प्रत्येकाची कथा आहे. सौदामिनी विदेशात टेक्सास येथे राहत असते. तिच्या आयुष्यात एक अशी घटना घडते, ज्यामुळे ती सुन्न होऊन जाते. तिचं आयुष्यचं थांबून जातं. तिच्या मनात एकच विचार उरतो, स्वतःला संपवायचं किंवा ‘त्या’ला संपवायचं. हे सगळं ती तिच्या भारतातील मित्राला सांगते. तो मित्र म्हणजेच डॉ. समीर सौदामिनीला भारतात येण्याचा सल्ला देतात. भारतात आल्यावर तिला ते वारीत घेऊन जातात, जिथे तिची भेट होते एका बाबांशी. हे बाबाच सौदामिनीचे मार्गदर्शक ठरतात. सौदामिनीचं उदास मन व खोचक प्रश्न आणि तिच्या त्या प्रश्नांना बाबांची तितकीच सकारात्मक आणि सखोल उत्तरं, असा विलक्षण प्रवास पुढे सुरू होतो. प्रत्येकाला स्वतःच्या अनंत रूपांशी, स्वतःच्या भावनांशी जोडून देणारी ही कथा आहे. त्यामुळेच हे नाटक पाहताना एक वेगळी अनुभूती मिळते—जी काहींना स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी देते, तर काहींना आपल्या आतल्या संघर्षाची जाणीव करून देते.
शेवटी… ज्याचा त्याचा विठ्ठल!
या नाट्यानुभवातला गाभा असा आहे की, प्रत्येकाला आपला विठ्ठल शोधता येतो, पण त्यासाठी योग्य योग यावा लागतो. जेव्हा तो क्षण येतो, तेव्हा आपल्याला आपला विठ्ठल भेटतोच! विठ्ठल सापडला म्हणजे आयुष्याचा मार्ग आपसूकच सुकर होऊ लागतो. त्यापुढे मार्गात अडथळे येत नाहीत का? येतात ना! पण त्या संकटांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विठ्ठलच आपल्याला देतो. चुकीचे निर्णय न घेता योग्य मार्गाने पुढ्यात उभ्या ठाकलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद हा विठ्ठलच आपल्याला देतो, आणि अलगद आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढतो.
कलाकारांची मेहनत आणि संदेश
अमित वझे आणि डॉ. समीर कुलकर्णी यांचं या कलाकृतीत मोठं योगदान आहे. फार कमी लोकांमध्ये एखाद्या कलाकृतीचं सौंदर्य इतरांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता असते. जे सौंदर्य आपलं मन टिपू शकतंय ते दुसऱ्यापर्यंत अगदी सहजरीत्या पोहोचविण्यासाठी एक वेगळंच कौशल्य अंगीभूत असावं लागतं, आणि या दोघांनी हे कौशल्य सराईतपणे आत्मसात केलेलं आहे, याबद्दल शंकाच नाही. डॉ. समीर कुलकर्णी यांची संकल्पना व रंगावृत्ती आणि अमित वझे यांचं दिग्दर्शन अप्रतिम! सौदामिनीसोबत अख्खं प्रेक्षागृहच त्या वारीत सामावलं जातं, ते या दोघांनी उभ्या केलेल्या दृक-श्राव्य अनुभवामुळे! अर्थात त्यांना साथ मिळाली आहे सशक्त कलाकारांची!
अभिनय आणि आवाजाची जादू
सौदामिनी हे पात्र साकारलंय मधुराणी गोखले प्रभुलकर या सशक्त अभिनेत्रीने. अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांनी आजवर अनेक माध्यमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे तर त्या घरोघरी पोहोचल्या. मालिका संपण्याच्या वाटेवर असतानाच ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाटकाची त्यांना विचारणा झाली. संहिता ऐकताच त्यांना रडू आवरलं नाही. लगेचच त्यांनी अमित वझे यांना होकार कळवला. सौदामिनी या भूमिकेस त्यांनी योग्य न्याय दिला आहे. त्यांचे स्पष्ट उच्चार आणि सुरेख मुद्राभिनय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. सौदामिनीच्या व्यक्तीमत्त्वात एक प्रकारची व्याकुळता आणि गूढता आहे, जी मधुराणींनी आपल्या हावभाव आणि देहबोलीतून अगदी प्रभावीपणे दाखवली आहे. सौदामिनीच्या प्रवासात ती स्वतःच्या मानसिक छटांमधून प्रवास करते—कधी निराशा, कधी क्रोध, कधी आत्मशोध. या संपूर्ण भावनांचा प्रवाह त्यांनी फारच परिणामकारकरित्या साकारला आहे.
दिग्गज अभिनेते गजानन परांजपे यांच्याबद्दल मी वेगळं काय कौतुक करणार? त्यांची आतापर्यंतची रंगभूमीवरील लखलखीत कारकीर्द आणि ही भूमिका म्हणजे त्यावर चढलेला सोनेरी कळसच म्हणावा लागेल. त्यांनी वारीत सहभागी झालेले कीर्तनकारी बाबा अगदी झक्क उभे केले आहेत. त्यांचा आवाज म्हणजे या व्यक्तिरेखेसाठी एक दैवी देणगी आहे. काहीजण तर प्रयोग संपल्यानंतर त्यांच्या पायाही पडत होते.
अंजली मराठे यांच्या आवाजाने पुन्हा एकदा रंगभूमीवर जादू घडवून आणली आहे. यावेळी फक्त सुरांचीच जादू नाही तर त्यांच्या मधुर आवाजतून त्यांनी एक अशी व्यक्तिरेखा उभी केली आहे जी प्रत्येक जण प्रेक्षागृहातून बाहेर पडताना आपल्यासोबत घेऊन बाहेर पडेल. त्यांचा आवाज हा केवळ गायकाचा आवाज राहत नाही, तर एका भावनिक प्रवासाला दिशा देणारा ठरतो. त्याचप्रमाणे निनाद सोलापूरकर आणि पार्थ उमराणी यांनीही आपल्या आवाजाच्या ताकदीने व वाद्यांच्या सहाय्याने हे नाटक अधिक प्रभावी केलं आहे.
चित्रांचा जिवंत संवाद — कला अनुभवण्याचा नवा आयाम
मिलिंद मुळीक हे सुप्रसिद्ध जलरंगचित्रकार असून, त्यांच्या चित्रशैलीत एक विशेष जिवंतपणा आहे. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाटकात त्यांनी रेखाटलेली चित्रे फक्त पार्श्वभूमी सजवण्यासाठी नाहीत, तर त्या चित्रांमधून कथानकाला आणखी एक वरचा स्तर मिळतो. प्रत्येक दृश्यामध्ये रंग आणि रेषांच्या मदतीने भावनांचा प्रवाह सहज अनुभवता येतो. मिलिंद मुळीक यांच्या चित्रांमध्ये एक विलक्षण सजीवता असते—जणू काही ती केवळ स्थिर चित्रे नसून, स्वतःच काहीतरी सांगत असतात. नाटक पाहताना प्रेक्षक केवळ संवाद आणि अभिनयाच्या आधारे कथेशी जोडला जात नाही, तर मुळीक यांच्या चित्रांमुळे त्या प्रवासाचा एक भाग होतो. “ज्याचा त्याचा विठ्ठल” ही फक्त एक दृक-श्राव्य अनुभूती नाही, तर तो एक चित्रात्मक प्रवासही आहे. मिलिंद मुळीक यांच्या चित्रांनी ही कलाकृती आणखी समृद्ध केली आहे, आणि त्यामुळे हे नाटक फक्त एक संवादप्रधान अनुभव राहत नाही—तर ते कथा, अभिनय, संगीत आणि चित्रकला यांचा मिलाफ ठरतो.
ही कलाकृती अनुभवणं म्हणजे स्वतःच्या मनाच्या अनंत छटांचा वेध घेणं. आणि म्हणूनच, “ज्याचा त्याचा विठ्ठल” हे नाटक फक्त भक्तिरसात न्हालेलं नाही, तर तो एक मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे, जो प्रत्येकाने अनुभवायला हवा.