विनोदी आणि कौटुंबिक नाटकांची रंगभूमीवर कायमच रेलचेल असते. अशा नाट्यप्रकारांना प्रेक्षकांची भरघोस पसंतीही मिळते. मात्र, याच गर्दीत एक जाणकार आणि चोखंदळ प्रेक्षकवर्ग असा आहे, जो सतत चाकोरीबाहेरच्या, विचार करायला लावणाऱ्या नाटकांची वाट पाहत असतो. या प्रेक्षकांना कौटुंबिक किंवा विनोदी नाटके नकोशी वाटतात असं नव्हे, पण विषयातील वेगळेपण, सादरीकरणातील संवेदनशीलता आणि कथानकाची खोल विचारप्रवृत्ती यांचं त्यांना अधिक आकर्षण असतं. अशा रसिक आणि विचारशील प्रेक्षकांसाठी सध्या रंगभूमीवर पर्वणी ठरत आहे ते नाटक म्हणजे संजय जमखंडी लिखित आणि दिग्दर्शित, आत्मशोध आणि अंतर्मनाच्या संघर्षाची सजीव मांडणी करणारे दोन अंकी नाटक — ‘मी vs मी’! या वेगळ्या धाटणीच्या नाटकाला प्रेक्षकांनी कमाल साथ दिली. त्याचीच परिणती म्हणून २७ एप्रिल रोजी हे नाटक २५ चा प्रयोगाचा रौप्य महोत्सवी टप्पा गाठणार आहे.
रविवार, २७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता या नाटकाचा २५ वा प्रयोग श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे दणक्यात पार पडणार आहे. नाटकाच्या संपूर्ण टीममध्ये चैतन्याचं वातावरण आहे आणि ते तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.
मी vs मी नाटकाची ही प्रमुख ५ वैशिष्ट्यं!
१. अशक्यतेपासून नव्या उमेदीपर्यंतचा प्रवास
नाटकाची सुरुवात जरी अत्यंत गंभीर मुद्द्याने होत असली तरी शेवट इतकं गोड होतो की आपल्याला आपल्याच आयुष्यातील एखादा प्रश्न सुटल्याचा आभास होतो. एक युवक जो मानसिक त्रास आणि डिप्रेशनमुळे खचून गेला आहे. या त्रासातून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी त्याने इच्छामरणाची याचिका कोर्टात दाखल केलेली असते. ही याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात येते. परंतु, या कठीण स्थितीत एक अज्ञात व्यक्तीचा त्याला फोन येतो. तो अज्ञात इसम युवकाला मदत करण्याची ऑफर देतो, पण मोबदल्यात एक काम सांगतो. यापुढे नायकाची एका मानसिक आणि भावनिक प्रवासाला सुरुवात होते. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा प्रसंगाना सामोरं जात या नाटकाचा अत्यंत सुखद शेवट होतो. हे नाटक नुसते वेदनांचे नाही, तर नव्या उमेद, विश्वास, आणि आशेच्या पुनःनिर्मितीची कथा आहे. त्याच्याद्वारे आपण पाहतो की जीवनात कधीही हार मानता येत नाही आणि आशेचे एक छोटंसं पाऊल देखील आपल्याला नवीन दिशा देऊ शकते.

२. संवादातून उभं राहणारं भावनिक आणि विनोदी नातं
संजय जमखंडी यांनी लिहिलेलं हे नाटक संवादाच्या माध्यमातून एका अत्यंत गोड आणि गमतीशीर नात्याचं चित्रण करतं. हृषिकेश जोशी आणि क्षितिश दाते यांच्यामधील संवाद ते किती हलके आणि खूप विनोदी असू शकतात हे दाखवतात. गंभीर विषयावरही, एकमेकांवर केलेले गोड विनोद आणि कधी कधी हातून सुटून गेलेल्या अनमोल क्षणांच्या गप्पा, हे सर्व काही दर्शकांना नाटकात गुंतवून ठेवतं.
३. मानसिक आरोग्याविषयी सशक्त सामाजिक भाष्य
अद्यापही, ‘थेरपी’ किंवा ‘डिप्रेशन’ या शब्दांना समाजात अज्ञेयतेचे किंवा चुकीचे लेबल लागले आहे. विशेषतः मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये असलेली अज्ञानता आणि संकोच समाजात सुसंस्कृत न झालेल्या विचारधारेचे संकेत देतात. ‘मी vs मी’ हे नाटक मनाच्या कंगोऱ्यांना स्पर्श करत, मानसिक आजारांविषयी समाजात असलेला गैरसमज दूर करण्याचा आणि त्याबाबत संवेदनशीलपणे संवाद उभा करण्याचा प्रयत्न करतं. लेखक संजय जमखंडी यांच्या संवादातून, मानसिक आरोग्याचा किंवा कुठल्याही शारीरिक दुर्बलतेचा विषय हा हाताळण्यास अशक्य नसून त्यासाठी समजूतदारपणा, संवाद आणि आधार आवश्यक असतो, हे स्पष्ट होते.
४. दर्जेदार अभिनय आणि सशक्त सादरीकरण
या नाटकाचे खरे यश त्याच्या अभिनायात आहे. हृषिकेश जोशी आणि क्षितिश दाते यांनी दिलेल्या अभिनयाने एक अत्यंत प्रगल्भ आणि संवेदनशील वातावरण निर्माण केले आहे. हृषिकेश जोशी यांचे उत्कृष्ट अभिनय कौशल्य आणि क्षितिश दाते यांच्या भूमिकेतील सुसंवाद प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवतात. त्याचप्रमाणे, शिल्पा तुळसकर यांच्या सहजसोप्या वाटणाऱ्या मात्र तितक्याच कठीण अशा व्यक्तिरेखेने कथेला एक वेगळंच वळण दिलं आहे. त्यामुळे नाटक अधिकच रंजक आणि आकर्षक बनत जातं.
या नाटकातील सहकलाकार महेश सुभेदार, चिन्मय पटवर्धन, दिनेश सिंह यांनी त्यांना दिलेल्या भूमिका सुंदर साकारल्या आहेत. या सर्व पात्रांच्या आणि अनिष दाते या मुख्य नायकाच्या पहिल्या भेटीचा प्रसंग तर मनात घर करून राहतो. सर्वांनी या प्रसंगात धमाल उडवली आहे.
५. निर्मितीमूल्यांची कमालीची जाण
नाटकाच्या निर्मितीमूल्यांचा विचार केला, तर ती उच्च दर्जाची आहेत. ज्याचं संपूर्ण श्रेय जातं नाटकाच्या निर्मात्यांना! भरत नारायणदास ठक्कर, प्रवीण भोसले आणि सहनिर्मात्या शिल्पा तुळसकर यांनी कुठल्याच विभागात कसलीच कमतरता होऊ दिली नाहीये. एकाच नाटकात विविध लोकेशन्सचा वापर अत्यंत कल्पकतेने केला जातो. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, आणि वेशभूषा या सर्व गोष्टी एकत्रितपणे प्रेक्षकांना एका वेगळ्याच प्रवासाला घेऊन जातात. प्रत्येक जागेचा उपयोग नाट्याच्या भावनात्मक प्रवासासाठी उत्तम रीतीने केला जातो, ज्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळं आणि उत्कंठावर्धक अनुभव मिळतो. नेपथ्यकार संदेश बेंद्रे, प्रकाशयोजनाकार अमोघ फडके, संगीतकार समीर म्हात्रे, वेशभूषाकार तृषाला नायक, रंगभूषाकार राजेश परब, ध्वनी आरेखन करणारे मंदार कमलापूरकर, कार्यकारी निर्माता प्रणत भोसले यांच्या एकत्रित परिश्रमांतून एक परिपूर्ण नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
निष्कर्ष
‘मी vs मी’ हे नाटक एक प्रभावी आणि नेत्रदीपक अनुभव आहे, जे ते मानसिक आरोग्य, आत्महत्या, नाती आणि जीवनाची नवीन दिशा यांवर प्रकाश टाकतं. हे नाटक दर्शवते की मानसिक आजार म्हणजे वेडेपण नाही आणि जीवनाच्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आशा आणि विश्वास आवश्यक आहे. हृषिकेश जोशी, क्षितिश दाते, आणि शिल्पा तुळसकर यांच्या अभिनयाने हे नाटक आणखी चांगले बनले आहे. संजय जमखंडी यांचे लेखन नक्कीच आजच्या पिढीला एक महत्त्वपूर्ण संदेश देणारे आहे. या नाटकाच्या संपूर्ण टीमची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला नक्की उपस्थित रहा २५ व्या प्रयोगाला!