आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. जशी विद्यार्थ्यांमध्ये गुणांची स्पर्धा रंगते, तशीच ती त्यांच्या पालकांमध्येही रंगताना दिसते. पालक कोचिंग क्लास आणि शाळांच्या रग्गड फिया भरून मुलांना उत्तमोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. याच्याच अगदी विरुद्ध असं एक कुटुंब आपल्याला या नाटकात बघायला मिळणार आहे. चंद्रू आणि चांदणी… चांदणीला अभ्यासाची आवड आणि चंद्रू अगदीच खट्याळ… त्यांच्या वडिलांचं पात्र साकारणाऱ्या संजय नार्वेकर यांना मात्र पुस्तकाचा तिटकारा असतो. त्यामुळे त्यांचा मुलांच्या पुस्तक वाचण्यालाही नकार असतो. मुलांच्या आईचीहि त्यांना साथ असते.
या सगळ्यात मुलांची मात्र खूपच कुचंबणा होत असते. अशातच एक चमत्कार घडतो… आता हा चमत्कार कोणता? आणि तो कसा घडतो? त्याचे परिणाम काय होतात? आई बाबांचं मत परिवर्तन होतं का? हे सगळं जाणून घेण्या साठी तुम्हाला साईराज निर्मित रत्नाकर मतकरी लिखित आणि ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित चमत्कार या नाटकाला भेट द्यावी लागेल.